Monday, December 18, 2006

पाऊस

हे फार पूर्वी कधीतरी लिहीलेलं. परवा पावसाबद्दल लिहीलं तेव्हा आठवलं अचानक:

********************************************
हल्ली पाऊसही पडत नाही पूर्वीसारखा....
पूर्वी आपण भेटल्यावर आलं घातलेल्या चहाचा एक घोटही घेतला नाही, की धो-धो पाऊस पडायला लागायचा!
"आज जरा लवकर जायला हवं," असं म्हणत म्हणत आलेलो आपण दोघेजण मग शांतपणे पावसाकडे बघत बसायचो....
पावसाच्या निमित्ताने का होईना आपल्या भेटीचा वेळ वाढतोय, या कल्पनेने मनोमन सुखावत.
पाऊस थांबायची वाट बघता बघता गप्पा इतक्या रंगायच्या की पाऊस थांबल्याची आठवण फार उशीरा व्हायची!

हल्ली तू येतोस तेच घड्याळाकडे पहात पहात -
चहा घेता घेता पावसाची सर आलीच एखादी, तर तीदेखिल चहा संपता संपताच ओसरते
"पाऊस थांबलाच आहे तर निघूयात... पुन्हा कधी कोसळायला लागेल नेम नाही..." म्हणून निघून जाताना
तुझी पावलं जराही घुटमळत नाहीत
मग मी तुझ्या पाठमोऱ्या सावल्या मनात साठवत राहते.
सारं कसं पार बदललंय...
हल्ली पाऊस तरी कुठे पडतो, पूर्वीसारखा....!

Friday, December 15, 2006

पाऊस पापणीआड ...कधीचा... असतो!

"उद्या छत्री जवळ ठेव बरं! पाऊस पडणार आहे."
"च्यामारी, म्हणजे सकाळी आठच्या class ला पावसापाण्याचं जावं लागणार!"
"नाही, नाही... सकाळी नाही. दुपारी दोन ते पाचच्यामध्ये पडणार आहे."

.... छ्या! हा काय पाऊस झाला? Weather.com च्या सांगण्यानुसार शॉवर चालू करावा तसा पडणार आणि वेळ झाली, की पुन्हा शॉवर बंद केल्यासारखा थांबणार! तोवर सगळेजण आपापल्या ऑफिसात स्वतःला कोंडून घेणार. Meetings वगैरे शक्यतो आधीच उरकून घेणार. ज्यांचं ऑफिस basement मध्ये आहे, त्यांना तर कळणार पण नाही बाहेर पाऊस पडतोय की काय ते.... किती boring आहे इथला पाऊस! बरं, पाऊस पडून गेल्यावर पण पावसाच्या काही विखुरलेल्या खाणाखुणा, ओल, चिखल, काही नाहीच!! रस्ते लगेच कोरडे... सगळं लगेच पूर्वीसारखं....

पावसाने कसा 'अवेळी' येऊन 'धिंगाणा' घातला पाहिजे! :) किंवा आजिबात ध्यानीमनी नसताना, मस्त ऊन पडलेलं असताना, अचानक दाटून येऊन रस्त्यात 'गाठलं' पाहिजे आपल्याला! मग आपण थोडं भिजत, घाईघाईने जाऊन कुठेतरी आडोसा शोधायचा, उशीर होतोय वगैरे सगळं विसरून नुसतं पावसाकडे बघत रहायचं. पाऊस जरासा कमी होऊन फक्त थोडी रिपरिप उरेल, तेव्हा ओढणी डोक्यावर घेऊन उगाचच पावसापासून जपण्याचा आव आणत, ती भुरभुर हलकेच अंगावर झेलत, भिजत भिजतच घरी जायचं. मग छानपैकी आलं घातलेला चहा प्यायचा :) ! इथे च्यायला पावसाकडे बघायची सुद्धा पंचाईत.... Graduate Office च्या एकुलत्या एका इवल्याश्या खिडकीतून, blinds किलकिल्या करून, समोरच्या दोन इमारतींच्या मध्ये दिसेल एवढाच पाऊस! :( आणि इथे पावसाळा पण नाही.... दोन-तीन महिने उकाड्याने त्रासून जाऊन पावसाची वाट बघणं, मग मोन्सून कुठपर्यंत आलाय ते वाचायला उत्सुकतेने पेपरची पानं चाळणं, पहिला पाऊस झाला की मग हायसं वाटून मस्तपैकी भिजणं, लगबगीने छ्त्र्या-रेनकोट वगैरे बाहेर काढणं, ठिकठिकाणी लागणाऱ्या पावसाळी सेल मधे एका हातात छत्री घेऊन हौसेने खरेदी करणं, काहीच नाही!! मला आठवतं, पहिल्या पावसाच्या वेळेस हमखास माझी परीक्षा असायची! शेवटचाच पेपर राहिलेला असायचा बहुतेकवेळा.... पण अभ्यासाचं कितीही tension असलं तरी एकदा आभाळ भरून आलं, आणि 'जोराचा वारा-मातीचा वास' वगैरे सहित पावसाची चिन्हं दिसू लागली की अभ्यासात लक्षच लागायचं नाही! दुसऱ्या दिवशी परीक्षा म्हणून आई भिजू द्यायची नाही. पण तरी हळूच बाहेर ओट्यावर जाऊन थोडासा पाऊस अंगावर झेलायचा, मग खिडकीतून बाहेरच्या झाडा-झुडपांवर मनसोक्त कोसळणारा पाऊस बघत उगाचंच थोडं हळवं व्हायचं, पाऊस थांबल्यानंतरही हवेत दरवळत राहिलेला त्याचा सुवास श्वासांत भरभरून घ्यायचा; आणि मग संध्याकाळी अंधार झाल्यावर MSEB च्या कृपेने वीज गेली(ती काय चार शिंतोडे पडले तरी जातेच!) की दुपारभर वेळ फुकट घालवला म्हणून emergency light च्या उजेडात पहाटेपर्यंत अभ्यास करायचा, हे दर वर्षीचं ठरलेलं असे!

इथे म्हणजे वर्षभर केव्हाही पाऊस पडणार, अर्थात आधी weather.com वर कळवूनच.... आणि एखादं routine काम उरकून गेल्यासारखा जाणार! पावसाळा वगैरे काही नाही! :( फारच नाराज होते मी इथल्या पावसावर. परका देश, परकी माणसं, अचानक आलेला एकटेपणा, सगळ्याशी जुळवून घेता घेता पुरती भांबावले होतेच मी... पण इथे पावसानेदेखिल पावसासारखं वागू नये? तेवढ्यात एकदा, दुपारी ऑफिसमधून निघून class ला जात असताना अचानक पावसाने गाठलंच मला. मग धावत धावत जाऊन Gorgas Library च्या porch मध्ये आडोश्याला उभं राहून बघितलं, तर फार काही वेगळा नव्हता अमेरिकेतला पाऊस! समोरचं मोठ्ठं लॉन आणि त्याच्या कडेकडेने रांगेत उभ्या असलेल्या मेपल वृक्षांवर कोसळणारा पाऊस डोळेभरून पाहून घेतला. पावसाशी नव्याने मैत्री व्हायला हे निमित्त पुरेसं होतं. तो ओसरल्यावर जरा जरा भिजत पाच मिनीट उशीरा वर्गात पोचले, आणि मग मला कुडकुडताना पाहून मास्तरांनी AC बंद केलं, तेव्हा खूप दिवसांनी आठवणींतल्या पावसाला भेटल्यासारखं वाटलं!

आता हळूहळू इथला पाऊसही आवडायला लागलाय.... :) १५-२० दिवस कोरडे गेले की मीच weather.com वर चक्कर मारून बघते, पुढचा पाऊस केव्हा आहे ते! कधी दुपारी काम करता करता अचानक खिडकीच्या तावदानावर थेंबांचा आवाज ऐकू यायला लागला की, आनंदाने blinds उघडून बघतेच! कधी कधी पाऊस पडत असताना उगाचंच छ्त्री घेऊन समोरच असलेल्या Starbucks मध्ये जाऊन कॉफी घेऊन येते :) आजही पावसाची आठवण येतीये.... बरेच दिवस झाले पाउस पडून...


पाऊस किती दिवसात फिरकला नाही
पाऊस कुणाला कधीच कळला नाही
पाऊस ऋतुचे निमित्त करूनी दिसतो
पाऊस पापणीआड... कधीचा.. असतो...
- सुधीर मोघे

पावसाइतका सख्खा मित्र मला भेटलेला नाही अजून!







ही नोंद 'शब्दबंध' या मराठी ब्लॉग अभिवाचनाच्या ऑनलाईन कार्यक्रमात वाचली गेली.

Monday, November 27, 2006

पत्र लिही पण...

आज आईचं पत्र आलं! तसं फोनवर बोलतोच आम्ही बरेचदा... कधी कधी चॅट पण करतो, मेल लिहीतो एकमेकींना... पण माझ्या वाढदिवसाचं निमित्त साधून या वेळेला तिने मला पत्र लिहीलं. तिने ते post केल्याचं सांगितल्याच्या चौथ्या दिवशी मी रूममेटकडून मेलबॉक्सची चावी आणि ते चेक करायची तिच्यावर ढकललेली जबाबदारी, स्वतःकडे घेतली! :-) रोज सकाळ-संध्याकाळ उत्सुकतेने मेलबॉक्स उघडून पहात होते. आज संध्याकाळी ते पत्र हातात आल्यापासून, म्हणजे गेल्या चार तासात पाच वेळा वाचून झालंय ते... :-) आणि सोबत बहिणीने पाठवलेलं अतिशय 'senti' greeting card सुद्धा तीनदा वाचलं! असं काय असतं बरं पत्रात? - रोज तिच्याशी बोलते मी, पण आज तिचं पत्र वाचून अगदी तिला भेटल्यासारखं वाटलं! इतका आनंद झाला की सगळ्यांना ओरडून सांगावसं वाटलं... पण एकालाच सांगितलं, फोन करून. हल्ली पत्रा-बित्राचं फारसं कौतुक राहिलेलं नाही कुणाला. माझी excitement फारशी कुणाला कळेल असं वाटलं नाही.

खरंतर त्या पत्रात पुन्हा पुन्हा वाचावं असं वेगळं काहीच नाही. आईच ती - लिहून लिहून काय लिहीणार? "तब्बेतीची काळजी घे. जास्त जागरण करत जाऊ नकोस. कामाचा फार ताण घेऊ नकोस. थंडीत पुरेसे गरम कपडे घालत जा. नीट अभ्यास कर " - वगैरे typical आईछाप मजकूर आहे! :D तशी माझी आई पण अगदी साधी, रोखठोक आणि कणखर. मी इकडे यायला निघाले त्या दिवशी packing वगैरे तयारीच्या गडबडीत, गळ्याशी आलेला हुंदका तिने कळेल न कळेल असा परतवून लावल्याचं आठवतंय. आताही "एकंदरीत तू तिकडे रुळलीयेस याचं समाधान वाटतं, पण तुझी उणीवदेखिल प्रकर्षाने जाणवते" - एवढया एका वाक्यात ती मनातलं सगळं बोलून जाते... बाकी पत्रात सगळ्या वर सांगितल्याप्रमाणे आईछाप सूचना! तरीही ते पत्र चार वेळा आधाशासारखं वाचल्यानंतर पापण्या किंचीत ओलावल्याच... इतक्या दिवसांनी आईला भेटल्यावर तेवढं व्हायचंच, नाही का? :-) मी नाही बुवा तिच्याइतक्या कणखर मनाची!

इंदिरा संतांची ही सुरेख कविता आठवली आज:


पत्र लिही पण

पत्र लिही पण नको पाठवू
शाईमधुनी काजळ गहिरे
लिपीरेषांच्या जाळीमधुनी
नको पाठवू हसू लाजरे

चढण लाडकी भुवयीमधली
नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तिळ गालीचा
पूर्णविरामाच्या बिंदूतून

नको पाठवू अक्षरातुनी
शब्दामधले अधिरे स्पंदन
कागदातुनी नको पाठवू
स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सुवासिक
उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा
सांगितले मी: तू हट्टी पण...

पाठविसी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमध्येच मिळते
पत्र पुढचे त्यानंतर पण
वाचायाचे राहून जाते

-इंदिरा संत ('रंगबावरी')

Friday, November 24, 2006

कश्ती का खामोश सफर है...

संध्याकाळची वेळ, गार वारा, मावळतीकडे झुकणारा सूर्य, नदीचा शांत प्रवाह, एका नावेत ते दोघेजण. त्याला तिला काहीतरी सांगायचंय, पण कसं सांगावं ते कळत नाहीये. त्याला काय सांगायचंय ते तिला चांगलंच माहित आहे, खरंतर तो बोलण्याची ती आतुरतेने वाटच बघतीये... तो प्रस्तावना करतो -

कश्ती का खामोश सफर है, शाम भी है, तनहाई भी
दूर किनारे पर बजती है लहरोंकी शहनाई भी
आज मुझे कुछ कहना है
आज मुझे कुछ कहना है

'गर्लफ्रेंड' चित्रपटातलं हे गाणं. किशोर कुमार आणि सुधा मल्होत्राच्या आवाजातलं. हे गाणं ऐकल्या ऐकल्या जाणवते ती त्यातली 'शांतता'.... अव्यक्त भावनांमुळे किंवा त्या व्यक्त करता येत नसल्यामुळे निर्माण होणारी शांतता. पण ही शांततादेखिल नादमय आहे. अंगावर शहारा आणणारा गार वारा, लाटांचा हळुवार, लयबद्ध आवाज यांची सोबत आहेच या शांततेत... पण त्याहूनही नादमय आहे ती दोघांनाही ठाऊक असलेली एकमेकांच्या मनातली खळबळ! आता फक्त ती शब्दांत व्यक्त कशी करायची, आणि कुणी आधी करायची हा प्रश्न आहे! :-) "तू आधी बोलतोयस की मीच बोलू.." हे ठरत नसल्यामुळे अव्यक्त असलेली ती नाजूक भावना! अतिशय कमी, पण सुंदर पार्श्वसंगीत आणि किशोर कुमार व सुधा मल्होत्राचे हळुवार आवाज, या सगळ्या परिस्थितीच्या काव्यमयतेला हातभार लावतात. ते दृश्य अक्षरशः डोळ्यांपुढे उभं राहतं.

त्याने प्रस्तावना तर गेली, पण त्यापुढे काही सरकत नाहीये... :-)

आज मुझे कुछ कहना है
लेकिन ये शर्मिली निगाहें मुझको इजाजत दे तो कहूं
खुद मेरी बेताब उमंगे थोडी फुरसत दे तो कहूं
आज मुझे कुछ कहना है...

त्याच्या मनात जे आहे, तेच तिच्याही मनात आहे. त्याला ते व्यक्त करता येत नाहीये, हेही तिला कळतंय. मग ती म्हणते, "Umm... let's try to help him!" ;-)

जो कुछ तुमको कहना है वो मेरेही दिलकी बात न हो
जो है मेरे ख्वाबोंकी मंजिल, उस मंजिलकी बात न हो

तिच्याकडून एवढा encouraging response मिळूनसुद्धा अजून काही याचा बोलायचा धीरच होत नाहीये... :D

कहते हुए डर-सा लगता है, कहकर बात न खो बैठूं
ये जो जरासा साथ मिला है, ये भी साथ न खो बैठूं

आता मात्र ती जरा वैतागते - बोलून टाक की रे एकदाचं! अजून किती झुरवशील मला...

कबसे तुम्हारे रस्ते पर मैं फूल बिछाए बैठी हूं
कह भी चुको जो कहना है मैं आस लगाए बैठी हूं....

आता आपल्या मनात काय आहे, हे तिला कळलंय, हे त्याला कळलंय! :-) तिच्याही मनात तेच आहे, हेही कळलंय. थोडक्यात म्हणजे, दोघांना एकमेकांची 'दिल की बात' कळली आहे. मग आता जे बोलायचंय ते तो कसं चतुरपणे टाळतो पहा:

दिलने दिलकी बात समझ ली, अब मुंहसे क्या कहना है
आज नहीं तो कल कह लेंगे, अब तो साथही रहना है!

तिला मात्र ते त्याच्या तोंडून ऐकायचंच आहे... तिच्या

कह भी चुको... कह भी चुको जो कहना है

या लाडिक आग्रहाला तो गालातल्या गालात हसून उत्तर देतो,

...छोडो अब क्या कहना है...


खरंतर हिंदी सिनेमातली किती stereotypical, 'filmi' situation आहे ही. पण याला वेगळेपणा, अधिक मोहकपणा आणतात साहिर लुधियान्वीचे साधे, सोपे पण नेमके शब्द... आणि त्यांची सहज मांडणी. नेहमीच्या अंतरा-मुखडा pattern पेक्षा जरा वेगळी. सोपे आहेत, म्हणूनच ते शब्द जास्त भावतात, appeal होतात. दोघांमधला खराखुरा संवादच ऐकतोय असं वाटतं हे गाणं ऐकताना. साहिर सोडून दुसरा कुठला कवी या situation ला इतक्या मोहक पद्धतीने मांडू शकला असता असं वाटत नाही. ऐकल्यानंतर बराच वेळ लाटांचा लयबद्ध आवाज कानात घुमत राहतो... आणि गार वारा केसांतून फिरल्यासारखं वाटत राहतं!

Tuesday, November 21, 2006

रडू नको बाळा, डाळिंब देते...

परवा रात्री उशीरा असंच एका अर्ध्या तासाच्या assignment शी दोन तास खेळत बसले होते... It was one of those slow days... when you can't get anything done! म्हणजे उदास वगैरे नव्हते, पण उगाच कसले तरी विचार येत होते मनात. मध्येच आजीची आठवण आली. एक गाणं म्हणायची ती... नातवंडांना झोपवताना... माझ्या धाकट्या बहिणीसाठी, धाकट्या चुलत भावंडांसाठी तिला ते म्हणताना मी कित्येकदा ऐकलं होतं. कधीतरी लाडात येऊन मीपण तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले, तर माझ्यासाठी पण म्हणायची. आयुष्यभर कष्ट करून खरखरीत झालेला तिचा हात माझ्या केसांतून फिरवत... काय होतं बरं ते गाणं..? खूप प्रयत्न केला आठवायचा, पण काही केल्या आठवेचना! मग मी अस्वस्थ झाले. कशातच लक्ष लागेना....

मी सहावीत असताना आजी गेली. त्याआधी पण ती आमच्याकडे आणि सगळ्या काकांकडे जाऊन-येऊन असायची. त्यामुळे तिचा सहवास सलग फार दिवस कधीच मिळाला नाही. पण जेवढा मिळाला त्यातलं बऱ्यापैकी आठवतंय.... तरी सहावीत म्हणजे मी लहानच होते की! इतरांसारख्या आजी-आजोबांच्या आठवणी माझ्यापाशी नाहीत म्हणून मला नेहमीच खंत वाटते. आजोबांना तर मी पाहिलं देखिल नाही... आईच्या आई-वडिलांचादेखिल फार सहवास घडला नाही. मी कुठल्या आनंदाला मुकले, मुकते आहे याची मला चांगलीच जाणीव आहे!

ते गाणं काही केल्या आठवेना... चैन पडत नव्हती. घरी जाऊन झोपावं तरी पटकन शांत झोप लागेल असं नाही. आईला फोन करावा का?... तिला आठवेल नक्की... ! आईने खरंच विचारल्या विचारल्या लगेच सांगितलं ते गाणं:


रडू नको बाळा, डाळिंब देते
रडू नको बाळा, खेळायला नेते
मोत्याचा चेंडू यमुनेत गेला
धुंडीत धुंडीत उशीर झाला....


मला अगदी आजी म्हणायची त्या चालीत, तिच्या आवजात लगेच आठवलं ते गाणं... गुणगुणतच घरी गेले. शांत झोप लागली... आजीच्या मांडीवर लागायची तशी!

Saturday, November 18, 2006

थोडा 'चहा'टळपणा :-)

आज माझ्या roommate नी मला सकाळी सकाळी (Weekend ला साडेनऊ म्हणजे 'सकाळी सकाळी' च असतं) गरम गरम चहाचा कप हातात दिला! देव तिचं कल्याण करो... वाफाळता चहा (तोही आयता!) आणि टोस्ट... आणखी काय हवं आयुष्यात? :D चहा हे जगातलं अंतिम सत्य आहे... बाकी सगळं मिथ्या!

घरी सकाळ-संध्याकाळ आईबरोबर चहा व्हायचा. सकाळी ती करायची म्हणून तिला हवा तसा गोडसर, आणि मोजून पाऊण कप. संध्याकाळी ती शाळेतून दमून यायची म्हणून मी चहा करायचे... मला हवा तसा: पाणीदार, दूध कमी, साखर कमी, भरपूर आलं आणि मोजून साडेसात मिनीटं व्यवस्थित उकळलेला. शिवाय 'पाऊण' कपाचं बंधन नाही. स्वतःचा कप तुडुंब भरलेला आणि वर आई "मला एवढा नको गं बाई, कमी कर जरा.." म्हणणार म्हणजे तिच्यातलाही थोडा! :D आमच्या कॉलेजच्या canteen मध्येही झकास चहा मिळायचा. PL चालू असताना Reading Room मध्ये अभ्यासाला जायचे तेव्हा दुपारी डबा खाल्यावर हमखास येणारी झोप टाळण्यासाठी म्हणून सगळेजण चहाला जायचो, ते तासभर गप्पा कुटूनच परत यायचो. अगदीच उनाडक्या करायच्या असतील तर college बाहेरच्या विल्सनच्या टपरीवरचा 'कटिंग' चहा! त्या टपरीवर चहाबरोबरच सिगारेट फुंकणे हा मुख्य उद्योग चालत असल्याने पूर्वी मुली तिथे फारशा जात नसत. पण तिथे मिळणाऱ्या फक्कड चहाचा आस्वाद घेतल्यावर ती टपरी कॉलेजच्या समस्त भगिनीवर्गासाठी खुली करण्याचं सत्कृत्य अस्मादिकांनी केलं! आमच्यासारख्या सभ्य (:D) मुलींची वर्दळ वाढल्यावर, फुंकणारी मंडळी हळूहळू तिथे दिसेनाशी झाली. पुण्यात University Canteen (म्हणजे ते Garden Canteen - खरे वाङमय भवनाजवळचं.... Publication Department जवळचं indoor नव्हे!) मधला चहा मला सगळ्यात आवडायचा. मात्र कुठ्ल्याही उडप्याच्या हॉटेलात चहा मागवला तर बरेचदा निराशाच व्हायची. त्यात तो Tea Bags चा 'Dip-dip' चहा दिला की माझी चिडचिडच व्हायची. मग समोरच्या 'अमृततुल्य' मध्ये जाऊन परत एक-एक चहा घ्यायचा, हा ठरलेला कार्यक्रम!

इथे आल्यापासून चहा दुरावलाय... एकतर माझ्याइतकं आवडीने आणि कौतुकाने चहा पिणारं दुसरं कुणी नाही मित्रमंडळींपैकी. इथे जनता 'स्टारबक्स' ची कॉफी पिते. कॉफीचं मला वावडं नाही, पण चहा तो चहाच! चहा ठेवून तो उकळेपर्यंत वाट पहाण्याइतका वेळही नसतो बरेचदा... कॉफी पटकन Microwave मध्ये देखिल होते म्हणून तिला preference दिला जातो. असाच weekend ला कधीतरी चहाचा योग जुळून येतो... weekendचं कसं सार्थक झाल्यासारखं वाटतं.... :)

Thursday, November 16, 2006

एक 'सुरेल' अनुभव

रविवारी आमच्या विद्यापीठात भारतीय शास्त्रीय संगीताची मैफिल झाली. टस्कालूसासारख्या छोट्या University Town मध्ये असं काही बघायला/ऐकायला मिळेल, असं येण्यापूर्वी वाटलं नव्हतं. त्यामुळे या कार्यक्रमाबद्दल कळलं तेव्हा मला अगदी आश्चर्यमिश्रीत आनंद झाला. कार्यक्रम माझ्या वाढदिवशी होता, त्यामुळे स्वारी आणखीनच खुश! शास्त्रिय संगितातलं मला फारसं कळत नसलं तरी ते ऐकायला मात्र मला मनापासून आवडतं. नृत्यामुळे ताल-पद्धतीशी थोडा फार परिचय झालेला. शिवाय पुण्यात असताना माझा एक 'कानसेन' मित्र होता. त्याच्यामुळे कुठल्या रागात कसे सूर वापरतात, कुठल्या रागाचा mood कसा, feel कसा, कुठल्या वेळी गातात, कुठल्या गाण्यात कुठल्या रागाच्या छ्टा दिसतात वगैरे गोष्टी मला थोड्याफार कळू लागल्या. मी मुळात 'शब्दवेल्हाळ' (हा त्याचाच शब्द!) . म्हणजे कुठलंही गाणं ऐकताना त्यातल्या सूरांपेक्षा शब्दांवर माझं जास्त लक्ष! माझी सगळ्यात आवडती गाणी, त्यातल्या अर्थपूर्ण शब्दांमुळेच माझी आवडती आहेत. त्यामुळे माझी सूरांशी मैत्री करून देणं, त्याला अंमळ अवघडच गेलं! :-p पण आता मात्र सूरांशीदेखिल माझी बऱ्यापैकी गट्टी जमली आहे, असं म्हणायला हरकत नाही... :)

परवाच्या कार्यक्रमात बासरी आणि सतारीची जुगलबंदी होती. दोन्ही वाद्यांचे सूर मला फारच मोहक वाटतात. आनंदी, शांत, उदास, दुःखी... सगळ्याच प्रकारचे सूर या दोन्ही वाद्यांतून कमालीच्या सहजतेने निघू शकतात, असं मला वाटतं. बासरीच्या साथीला मृदंग आणि सतारीच्या साथीला तबला होता. कार्यक्रम खूपच बहारदार झाला. सगळेच कलाकार अगदी उत्तम होते. मला विशेष लक्षात राहिली ती त्यांनी सुरूवातीला वाजवलेली "वातापि गणपती" ही कर्नाटक संगीतातली 'हंसध्वनी' रागातली रचना. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाउन त्याच चालीवरचं "दाता तू गणपती गजानन" हे मराठी गाणं आणि "जा तोसे नाही बोलू कन्हैय्या" हे हिंदी गाणं पुन्हा पुन्हा ऐकलं ... :)

पण त्या कार्यक्रमानंतर माझ्या घरी असलेल्या माझ्या शास्त्रीय संगीताच्या लहानश्या collection ची मला फारच आठवण यायला लागली. सगळ्यात जास्त miss करतीये ते त्याच मित्राने दिलेल्या एका संतूर आणि बासरीच्या एका composition ला. मारवा आहे... माझा लाडका! पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरीप्रसाद चौरासिया... composition स्वर्गीय आहे हे वेगळं सांगायला नकोच! कसंही करून तातडीने ते मला internet वरून पाठवण्याकरता मी त्याला या weekend पर्यंत मुदत दिली आहे... :) कुणाला ऐकायचं असेल तर मला पुढच्या आठवड्यात मेल करा :)

Tuesday, November 14, 2006

वाट्टेल ते!

हा माझा ब्लॉग... इथे मी काय वाट्टेल ते लिहीणार! :D