Monday, July 2, 2007

थोऽऽडंसं जास्त

आपल्याला आयुष्याकडून जे अपेक्षित असतं ते मिळालं की आपण समाधानी असतो. पण ज्याची अपेक्षा असते त्यापेक्षा 'थोऽऽडंसं' जास्त मिळालं की आपण खरे खुश होतो. म्हणजे पहा, परीक्षेत ८८% मार्कं मिळणार अशी अपेक्षा असली आणि ८८% मिळाले की आपण समाधानी असतो, आनंद होतोच... पण जर ८८ ची अपेक्षा असताना ९०% मिळाले तर आभाळ ठेंगणं होतं! (Grad student ची धाव परीक्षेपर्यंतच :D असो.)

चिंचवडला आमच्या घरी दारावर भाजी विकायला एक भाजीवाला यायचा. आई त्याच्याकडून बहुतेक दर दिवसाआड भाजी घ्यायची. अगदी नेहमीचं, ठरलेलं गिऱ्हाईक. रोजची भाजी घेऊन झाली आणि आईने त्याचा हिशेब चुकता केला, की कधीकधी तो आईच्या पिशवीत मूठभर मिरच्या जास्तीच्या टाकत असे. हल्लीची terminology वापरून सांगायचं झालं तर - घेतलेल्या इतर भाजीसोबत 'फ्री'! त्या 'फ्री' मिरच्या, तो विक्रेता आणि त्याचं रोजचं गिऱ्हाईक यांच्यातल्या 'गुडविल'चं प्रतिक होतं. ह्याच 'गुडविल' मुळे एखादं वांगं कधी किडकं निघालं किंवा मेथी नेहमीसारखी टवटवीत नसली तर आई त्याला काही बोलत नसे. दूधवाल्या गवळयानं आपल्या भांड्यात रोजचं ठरलेलं लिटरभर दूध ओतल्यावर आणखी एक पळीभर जास्त घातलं, तर कधीमधी दूधात पाणी जास्त असलं की आपण त्याच्याजवळ कुरकुर करीत नाही हाही अशाच 'गुडविल' चा भाग!

घरी आम्हा बहिणींकडे रोज बाहेर वाळत घातलेले कपडे घरात आणून त्यांच्या घड्या करणं, धुतलेली भांडी जागच्या जागी लावणं वगैरे कामं असायची. ही कामं बहुतेकवेळा आई शाळेतून यायला पाच मिनीट राहिलेले असताना, घाईघाईने ती यायच्या आत कशीबशी होत असत. बरेचदा ती आल्यावर, घरातला पसारा पाहून तिचा ओरडा खाल्यावरही होत असत. पण कधी कधी आई घरी आल्यावर सगळी भांडी जागच्या जागी, पसारा आवरलेला, कपडे नीट घडी घातलेले असले आणि वर गरम गरम पोहे तयार आणि गॅसवर चहा उकळत असला तर तिच्या चेहऱ्यावरील कौतुकमिश्रीत आनंदाला पारावार उरत नसे. मग रात्रीच्या जेवणात न मागता कांद्याचं थालीपीठ किंवा वरणफळं मिळत! :)

आताच्या मास्तरांच्या बाबतीतही असंच. त्यांना हवी असलेली सगळी माहिती रीपोर्टमध्ये दिली, तर नेहमीचा काहीतरी शेरा लिहून, एक-दोन फुटकळ चुका काढून दुसऱ्या दिवशी रीपोर्ट मेलबॉक्समध्ये ठेवलेला असतो. स्वतःहून काहीतरी नवीन माहिती मिळवली आणि ती लिहीली, किंवा एखादी नवी कल्पना, नवी कन्सेप्ट सांगायचा प्रयत्न केलेला असेल तर त्याच दिवशी संध्याकाळी भेटायला बोलावून कौतुक करतील (म्हणजे उघड-उघड कौतुक नाही. ते मास्तरांच्या जातीला शोभत नसावं. पण आडून आडून 'काहीतरी चांगलं केलंस' - असं सांगतात), आणिक चार गोष्टी समजावून सांगतील, सुधारणा सुचवतील. शुक्रवारी संध्याकाळी काम करताना दिसले तर चक्क "बास झालं आता. जा घरी" - असंही म्हणतील.

नात्यांच्या बाबतीतही असंच असावं का? प्रेम, मैत्री वगैरे प्रत्येक नात्याकडून 'हे हवं, ते नको' अशा black and white मध्ये requirements नसल्या, तरी subconsciously काही किमान अपेक्षा असतातच ना आपल्या. त्या अपेक्षा परस्परांकडून पूर्ण होत असतात, म्हणूनच नातं टिकून असतं. जपलेलं असतं. पण या अपेक्षांपेक्षा 'थोऽऽडंसं जास्त' जेव्हा अनपेक्षितपणे एखाद्या नात्यातून मिळतं तेव्हा आपण खरे सुखावतो. ते नातं खऱ्या अर्थाने अतिशय जिवाभावाचं, special, precious होऊन जातं. यामुळेच आधीच्या किंवा नंतरच्या लहानमोठ्या चुका माफ केल्या जातात. खंबीरपणे कुठल्याही प्रसंगात त्या नात्याला साथ दिली जाते. जरा त्रास झाला तरी ते नातं जोपासण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो.

आज जरा dull, uninspired वाटत असतानाच मला आजपर्यंत किती नात्यांनी अपेक्षेपेक्षा 'थोऽऽडंसं' जास्त दिलंय याची आठवण झाली आणि... ladies and gentlemen, my chalice runneth over! :) The only way to return a favor is to pass it on - याचा मला कधीच विसर पडू नये, हीच इच्छा!