Monday, January 29, 2007

अघळपघळ

परवाच मिनोतीने आठवण करून दिली की मी बरेच दिवसात काही लिहीलेलं नाहीये. मग लक्षात आलं खूप दिवसांत लिहीण्यासारखं विशेष काही घडलेलंही नाही. बाकी फारसं काही घडत नाहीये हे चांगलंच आहे म्हणा... नाहीतर तीन-तीन असाईन्मेंट्स एका दिवशी ड्यू असणे, नोकरीच्या ठिकाणी बॉसला अचानक मिटींग्सवर मिटींग्स घेण्याची लहर येणे, तब्येत बिघडणे, घरातली सगळी ग्रोसरी संपणे, "रिसर्च कुठवर आलाय ते सांगायला येऊन भेट" म्हणून मास्तरांची ई-मेल येणे, एवढ्या सगळ्या 'विशेष' गोष्टी एकत्र घडतात ते दिवस नुसते आठवूनदेखिल दरदरून घाम फुटतोय! म्हणतात ना, "No news is good news" ... तसंच, काहीही न घडणे हे काहीतरी चांगलं घडल्यासारखंच आहे :)

नाही म्हणायला सगळं सुरळीत चालू आहे. सकाळीच एक होमवर्क (शेवटच्या क्षणापर्यंत धावपळ न करता) वेळेत सबमिट केला, उद्याच्या क्लासची तयारी झाली आहे, रूममेटनी बनवलेलं आयतं जेवण जेवून, त्यानंतर चुलत भावाच्या लग्नाचा एक लाडू खाऊन, संदीप खरेची गाणी ऐकत ब्लॉग लिहीत बसले आहे...

लागते अनाम ओढ श्वासांना
येतसे उगाच कंप ओठांना
होई का असे तुलाच स्मरताना
तनन दीम तदेरेना देरेना...

- मला सांगा... सुख-सुख म्हणतात ते आणखी काय असतं? :) डिट्रॉइटहून येताना भावाकडून संदीप खरे - सलील कुलकर्णीची 'सांग सख्या रे' आणली... अजून पारायणं चालू आहेत, पण 'लागते अनाम ओढ श्वासांना...' सध्या 'चढलंय'... मस्त जमून आलंय हे गाणं!

अमेरिकेत होऊनही पारंपारिक मराठी पद्धतीने झालेला भावाचा लग्नसोहळा... या आठवड्यात आणखी एका मित्राचं पुण्यात लग्न आहे. 'शादी किसीकी भी हो, अपना दिल गाता है' - दोन प्रेमी जीवांच्या एकत्र येण्याइतकी आनंदाची गोष्ट दुसरी काय असू शकते? पण या लग्न झालेल्या, त्यातल्या त्यात नवीन लग्न झालेल्या लोकांचा एक प्रॉब्लेम असतो... आपलं लग्न झालं म्हणजे "आता तू केव्हा लग्न करतोयस/करतीयेस?" असं सगळ्या अविवाहित मित्र-मैत्रीणींना किंवा भावा-बहिणींना विचारायचा यांना लायसन्सच मिळतो जणू! जसं काही ते एखाद्या सापळ्यात अडकलेत आणि आता शक्य तितक्या लोकांना त्यात ओढू पहातायत असं वाटतं... किंवा आपलं लग्न झालंय म्हणजे आपण कुणीतरी मोठे झालो आहोत, आणि समस्त अविवाहित मंडळींच्या लग्नाची जबाबदारी आपल्याच डोक्यावर आहे, असं काहीतरी त्यांना वाटत असावं बहुधा! नवीन लग्न झालेल्या आणि रिटायर झालेल्या लोकांमध्ये हे एक साम्य असतं -- उगाच दुसऱ्याच्या लग्नाच्या चौकशा करणे. असो.

या सुट्ट्यांमध्ये दोन-चार पुस्तकं वाचली... आणिक दोन-चार वाचायची राहिली. वाचलेल्यांपैकी विशेष न आवडलेलं म्हणजे चेतन भगतचं 'Five Point Someone'. बरेच दिवसांचं वाचायचं राहिलं होतं... गेली दोन-अडीच वर्षं काहीच वाचन झालं नव्हतं माझ्याकडून. सतत कशाततरी गुंतलेली असायचे. त्या काळात आलेली आणि लोकप्रिय झालेली सगळी पुस्तकं miss झाली आहेत माझ्याकडून. 'Five point...' ची बरीच hype झाली होती. त्यामानाने पुस्तकाने निराशा केली. तसं लेखकाचं हे पहिलंच पुस्तक आहे हे लक्षात घेता, निवेदनशैली वगैरे चांगली आहे... पण जनरल पब्लिकला हवा असलेला मालमसाला ठासून भरलाय, आणि IIT चं ब्रॅंड नेम कॅश केलंय! अगदीच वाईट आहे असं नाही, पण "What not to do at the IIT" ही त्याची punchline आणि एकंदरच त्यापुस्तकाचा आल्या आल्या झालेला गवगवा यामुळे उगाचंच अपेक्षा वाढल्या असाव्यात माझ्या.

दुसरं पुस्तक म्हणजे 'हृ्दयस्थ'. स्व. डॉ. नीतू मांडकेंच्या त्यांच्या पत्नीने लिहीलेल्या आठवणी. पुस्तक चांगलं आहे. डॉ. अलका मांडके रूढार्थाने 'लेखिका' नसल्याने या पुस्त्कात तथाकथित 'साहित्यिक मूल्य' नसेल फारसं, पण त्यांचं लिखाण फार प्रामाणिक आणि मनापसून आहे हे पदोपदी जाणवतं. डॉ. मांडकेंचं व्यक्तिमत्त्वाच इतकं प्रभावी होतं की अवतीभवतीच्या सगळ्यांना त्यांच्या दबावाखाली किंवा त्यांच्या प्रचंडत्वाच्या छायेत वावरावं लागे. तरीही एक 'माणूस' म्हणून ते किती थोर होते हे पुस्तक वाचून लक्षात येतं.

तिसरं पुस्तक - "The Bridges of Madison County" . गेल्या वर्षी मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंकात या पुस्तकाचा परिचय वाचला तेव्हापासून हे पुस्तक वाचायची इच्छा होती. सुट्टीत पब्लिक लायब्ररीतून आणून वाचलं. आवडलं. प्रेमकथांकडे फारसा कल नसलेल्यांना ते stereotyped bullshit वाटू शकेल कदाचित. खरंतर या पुस्तकाच्या बाबतीत मी लोकांची अतिशय टोकाची मतं ऐकली आहेत. पण मला overall आवडलं. काही काही ठिकाणी जरा कंटाळवाणं होऊन 'Mills and boons' च्या वळणावर जातंय की काय अशी शंका आली... पण मग कथानकाने लगेच पकड घेतली. या पुस्तकातलं नेमकं काय आवडलं आणि सौंदर्यस्थळं कुठली वगैरेवर वेगळा लेख होऊ शकेल. I will spare you that. आता या पुस्तकावर आधारित क्लिंट इस्ट्वूड आणि मेरील स्ट्रीपचा चित्रपट पहायची इच्छा आहे. बघू.

देशातून काकांनी ’अणसार’ नावाचं नवीन पुस्तक पाठवलंय. एका गुजराती कादंबरीचा मराठी अनुवाद आहे. डिट्रॉइटहून येताना फलाईटमध्ये ५०-६० पानं वाचली... एका कुष्ठरोग झालेल्या स्त्रीच्या आयुष्यावर आधारित कादंबरी असल्याने जरा depressing आहे. त्यामुळे "इतक्यात नको वाचायला... सुट्टीत बघू.." असा विचार मनात आला. पण आता स्वभावाप्रमाणे हातात घेतलेलं पुस्तक संपवल्याशिवाय चैन पडणार नाहीये. Hopefully शेवट जरा आशावादी किंवा प्रेरणादायी असावा!

काहीही विषय नसताना मी चिकार बडबड करू शकते हे मला माहित होतं, पण काहीही एक विषय नसताना इतकं खरडू पण शकते हे नव्यानंच कळलं! चला... झाली तेवढी अघळपघळ पुरे झाली! कामाला लागलेलं बरं... शुक्रवारी अजून एक सबमिशन आहे! Deadline is the ultimate inspiration - हेच खरं! :)

8 comments:

गिरिराज said...

काय मग प्रिया, लाडू कधी तुझ्याकडून??? :D

Mints! said...

giri, tu mast ratta khanar ata:)

changale lihile aahes. mi pan maaybolich lekh vachunach to movie pahila. ajun pustak nahi vachale.

Priti said...

paN hyaalaa aajUn license miLaayachay..! kaay re without license asa vichaartoys.. ek aaThavDaa thaamb ki! evaDhI ghaaI jhaalI kaa? :P :D

Priti said...

BTW, taai, chhaan lihilays..
malaa tar aataa pustaka vagaire vaachaaylaa veLach nasto, tarI college library madhye chaanglI pustaka miLataat.. mag mI aaNalelI pustakaa aaIch vaachUn kaaDhate..:) parvaa pravIN davaNeMcha "saavar re" aaNala hota tehI tinech vaachala..

प्रिया said...

गिरी... तुझ्या लग्नाची पत्रिका मला मिळाली नाहीये अजून! :x

मिनू, मलाही मूव्ही खूप दिवसांपासून पहायचाय... बघूयात कधी योग येतोय! :)

प्रीती... चालायचंच! मला पण जवळ जवळ दोन-अडीच वर्षांनी वेळ झालाय वाचन करायला! :)

Gayatri said...

मस्त! No news-good news सिद्धांत भारी आहे :) आणि 'लागते अनाम ओढ..' कालपासून मी पण लावून बसल्येय.." नको म्हणून गेलीस तीही किती अलगद..जशी काही कवितेला जावी दाद!"

प्रिया said...
This comment has been removed by the author.
प्रिया said...

अगदी अगदी, गायत्री! अगदी याच ओळीवर अपुन भी फिदा! :)
आणि ह्या पण:
"सहजतेच्या धुसर तलम पडद्यामागे
जपले नाहीस नाते इतके जपलेस मौन
शब्दच नाही, मौनही असते हजारार्थी
आयुष्याच्या वेड्या वेळी कळणार कुठून?"